
पोलादपूर, संदीप जाबडे
रायगड जिल्हा परिषदेसाठी पुढील महिन्याच्या ५ तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचा नुकताच दोन दिवसीय झंझावाती दौरा पार पडला. या दौऱ्यात आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचे मागासलेपण संपविण्याचा मी विडा उचलला असून येणाऱ्या १०-१५ वर्षात हा ठपका नक्की पुसून टाकू, मागासलेपण दूर करू. तालुक्याच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. प्रवीण दरेकर हे शनिवार आणि रविवार दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी त्यांनी कोंढवी, महालगूर, फणसकोंड, पळचिळ आदी गावांचा दौरा केला. दुसऱ्या दिवशी रविवारी देवपूर, परसूले, क्षेत्रपाल, कुडपण, कोतवाल, तुरुंबे बुद्रुक आदी गावांचा दौरा केला. याठिकाणी प्रत्येक गावागावात आ. प्रवीण दरेकरांच्या मार्गदर्शनाखाली बैठका पार पडल्या. या बैठकांना ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार कृष्णा कदम उर्फ के.के, पंचायत समितीचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण आणि युगेंद्र उतेकर यांना भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
दौऱ्यावर असताना ग्रामस्थांशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समितीतून येतो म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपा-राष्ट्रवादीला हवी. येथील जनतेला पोलादपूर तालुक्यात परिवर्तन हवेय. लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी असतात ते कंत्राटदार किंवा कंत्राटासाठी नसतात. येथे दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा, चांगल्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्यार्थी व युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले रस्ते, युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार. निवृत्त सैनिकांसाठी आधार किंवा सहाय्यता केंद्र, सहकारी तत्वावर कृषी व फलोत्पादन प्रक्रिया उद्योग, डेअरी, कुकूटपालन, शेतीपालन करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण करणार असेही ते म्हणाले. तसेच कुडपण गाव पर्यटन दर्जावाढ करून विकसित करणार असून केमिकल विरहित मिनी एमआयडीसी सुरु करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार. तालुक्यातील क्रीडापटूनसाठी क्रीडा भवनची निर्मिती करणार. बौद्धवाड्या मूलभूत सुविधांनी विकसित करणार आणि बुद्धविहारची निर्मिती करणार. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रकल्प साकारणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.



