कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाने समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने लोहारे विभागातील आठ शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे सुपुत्र व समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने सोमवार, २२ जून २०२६ रोजी लोहारे विभागातील आठ शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी, पोलादपूर तालुका यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा पार्ले, चरई, हावरे, सवाद, कणगुले, वझरवाडी, तुर्भे बुद्रुक तसेच सेमी इंग्रजी शाळा लोहारे येथील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी बोलताना समाजसेवक सुदेश उतेकर म्हणाले, “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,” या उक्तीप्रमाणे समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा आपला प्रयत्न कायम राहील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य भविष्यातही सुरू ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात सवाद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक दत्तात्रय उतेकर यांनी सुदेश उतेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सुदेश उतेकर यांच्यासारखे तरुण पुढे येत असल्याने समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा समाजाभिमुख कार्याला सर्व स्तरातून पाठबळ मिळाल्यास समाजातील कोणीही उपेक्षित राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसन्ना पालांडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, शहराध्यक्ष महेश निकम, तुर्भे खुर्दचे सरपंच गोविंद उतेकर, उपसरपंच राजेश उतेकर, दत्तात्रय उतेकर, आत्माराम उतेकर, माथाडी कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश पवार, सचिन जगताप, सहदेव उतेकर, गणेश उतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी समाजसेवक सुदेश उतेकर व भारतीय जनता पार्टी, पोलादपूर तालुका यांचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.



