धार्मिक व आध्यात्मिक
पोलादपूर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

पोलादपूर, संदीप जाबडे
सह्याद्रीच्या कुशीत व पवित्र सावित्री नदीच्या तीरावर पोलादपूर तालुक्यातील हॉटेल राजमुद्रा येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन १० मे २०२६ ते १७ मे २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भव्य कथासोहळ्याचा प्रारंभ रविवार, १० मे २०२६ रोजी होणार असून सांगता रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे.
या कथासोहळ्यात प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पवार (श्री वृंदावन धाम) आपल्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथाचे निरूपण करणार आहेत. दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कथा होणार असून, आठवडाभर विविध धार्मिक प्रसंगांवर आधारित कथा सादर करण्यात येणार आहेत. यात व्यासचरित्र, शुकदेव चरित्र, परीक्षित चरित्र, कलयुग वर्णन, परीक्षित श्रापकथा, सृष्टीनिर्मिती, ध्रुव चरित्र, कृष्ण जन्म, रासलीला, कंस वध, कृष्ण विवाह, सुदामा चरित्र आदी प्रसंगांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सांगता दिवशी, रविवार १७ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत संतोष महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कथासोहळ्यादरम्यान भजन-कीर्तन, संगीत सेवा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.
हा सोहळा नायक मराठा समाजाचे अध्यक्ष सुनिल तुकाराम मोरे (मालक, हॉटेल राजमुद्रा) यांच्या मातोश्री ह. भ. प. शांताबाई तुकाराम मोरे यांच्या आध्यात्मिक इच्छेच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन पोलादपूर तालुका वारकरी संप्रदाय व श्री राम वरदायिनी ग्रामस्थ मंडळ, काटेतळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत कथेमधील अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनिल मोरे यांनी केले आहे.



