पोलादपूरच्या तोतया पत्रकाराला आपली माती, आपली माणसं संघटनेचा दणका
तोतया पत्रकाराने अखेर मागितली माफी

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यात स्वतःला पत्रकार म्हणून सांगत नागरिकांना धमकावणे, त्रास देणे, महिला भगिनींना शिवीगाळ करणे, यासोबतच आपली माती, आपली माणसं सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याने “आपली माती आपली माणसं” संघटनेने अशा तोतया पत्रकाराचा खरपूस समाचार घेतला. संबंधित व्यक्तीने संघटनेबद्दल, समाजातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल, पत्रकारांबद्दलही अयोग्य व अवमानकारक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या तोतया पत्रकाराला आपली माती, आपली माणसं सामाजिक संघटनेने चांगलाच धडा शिकवला.
प्रदिप मेस्त्री ही व्यक्ती पोलादपूर तालुक्यात स्वतःला पत्रकार म्हणून सांगत नागरिकांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीस समज देत जाब विचारला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कडक शब्दांत इशारा देत अशा प्रकारचे कृत्य पुन्हा केल्यास संघटनेच्या वतीने अधिक कठोर भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांसमोर माफी मागितली. पुढे अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, असे आश्वासनही त्याने दिले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजात चुकीची माहिती पसरवणे, नागरिकांना त्रास देणे किंवा पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.
समाजाने अशा प्रवृतीन्ना आळा घालण्याची गरज
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडणे, प्रश्नांना वाचा फोडणे, शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताच्या बातम्या प्रकाशित करणे, शासकीय सेवा योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वृत्तांकन करणे ही पत्रकाराची प्रमुख जबाबदारी समजली जाते. मात्र अलीकडेच एखाद्या युट्यूब वाहिनीचे किंवा वेब पोर्टलचे ओळखपत्र मिळवून छोट्या व्यावसायिकांना धमकावणे, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाबद्दल गरळ ओकून स्वतःला मी कोणीतरी थोर असल्याचे भासविण्यात काही हौशी पत्रकार जास्त प्रयत्न करतात. ओळखपत्रापुरते मर्यादित असणाऱ्या पत्रकारांना समाजाने आळा न घालण्यास त्यांची हिम्मत वाढते. पत्रकारितेची चौकट माहित नसल्याने मग भोळ्या जनतेला लुबाडण्याचे, धमक्या देण्याचे काम हे बहाद्दर करतात. यामुळे या ओळखपत्र(आयडी) बहाद्दर पत्रकारांना प्रशासनाने देखील दूर ठेवणे गरजेचे असल्याचे जनमाणसात बोलले जात आहे.



